नकारातून स्वीकारलेलं प्रेम...जगजीत-चित्रा सिंग !
जगजीत_चित्रा !!!
(लग्नासाठी 'तिच्या' नवऱ्यालाच केली विचारणा....नकारातून स्वीकारलेलं प्रेम...)
"दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है
मिल जाये तो मिट्टी है खो जाये तो सोना है..."
जगविख्यात हिंदी-उर्दू गजल गायक-संगीतकार जगजीत सिंग आणि सुप्रसिद्ध गायिका चित्रा सिंग यांच्या प्रेमाची ही एक अजीब कथा....
इतरांप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी सुरवातीच्या काळात जगजीत यांच्याही वाटेला स्ट्रगल चुकले नाही...
त्या दिवसात जगजीत एक गुजराती फॅमिलीच्या घरी रेकॉर्डिंग निमित्ताने जात येत असत...त्या घराच्या समोरच्या घरातच चित्रा राहत होत्या...एकदिवस त्यांनी जगजीत बद्दल त्या गुजराती कुटुंबाकडे विचारणा केली असता त्यांना कळाले की जगजीत गायक आहेत... पण त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की "मला त्याचा आवाज अजिबात नाही आवडत..."
एक दिवस एका रेकॉर्डिंग स्टुडिओला योगायोगाने जगजीत आणि चित्रा या दोघांच्याही गाण्याच्या रेकॉर्डिंग शेड्युल होत...निर्मात्याला नवीन गायकांना घेऊन एक प्रायव्हेट अल्बम करायचं होतं...
चित्राजी स्टुडिओत आल्या आणि त्यांनी तिथे जगजितला बसलेलं पाहिलं आणि निर्मात्याला म्हणाल्या "मला याच्या सोबत रेकॉर्डिंग नाही करायची...माझ्या आवाजाची स्केल बारीक-पातळ आहे तर याचा आवाज बास सारखा भसाडा आहे...यावर जगजीत यांनी चित्रा कडे पाहिले आणि म्हणाले..."ठीक आहे,आज तुम्ही गाऊ नका..." असे म्हणत जगजितने त्या दिवशी त्यांच्या गाण्याचा भाग उरकला...
त्यानंतर काही दिवसांनी निर्माते महिंदरसिंग यांनी एका गाण्याची रेकॉर्डिंग चित्राजींच्या घरी ठेवली...त्याकाळी बॉक्स रेकॉर्डिंग होत असे...त्यासाठी त्यांनी जगजितलाही तिथे बोलावले होते. ठरलेल्या वेळेत जगजीत चित्राच्या घरी गेले...त्यांनी घराची डोअर बेल वाजवली...चित्रजींनी दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिलं तर हाच तरुण मुलगा एका भिंतीला डोकं टेकवून गाण्याच्या तालमीत हरवला होता...गाणं गुणगुणत होता...रेकॉर्डिंग सेशन झालं...दिवस संपला...
पुन्हा एक दिवस जगजीत आणि चित्रा यांचं एका गाण्याच्या निमित्ताने स्टुडिओमध्ये भेटणं झालं...त्यावेळी पहिल्यांदा चित्रजींनी जगजितला रेकॉर्डिंग नंतर घरी चालत जाण्यापेक्षा त्यांच्या गाडीत बसून आपल्या ड्रायव्हरला सांगून जगजितला घरी सोडते अशी ऑफर केली. त्याचबरोबर चित्राजी त्यांच्या घरी पोहचल्यावर जगजीत यांना चहासाठी आग्रह केला.अर्थात जगजीत यांनी स्वीकार केला.
आत किचनमध्ये चित्राजी चहा बनवत असताना त्यांना बाहेर बसलेल्या जगजितच्या गुणगुणण्याचा आवाज आला आणि त्या आवाजाने चित्राजी मोहित झाल्या... चित्राजींच्या हृदयावर जगजितच्या प्रेमाची दस्तक देणारी ही पहिलीच वेळ होती...
त्यानंतर भेटी वाढत गेल्या...दोघांमध्ये आणखी जवळीक वाढली...दोघांच्याही आवाजाला (गाण्यांना) एकत्रित मागणी होऊ लागली...त्यांनी असंख्य लाईव्ह मैफिल कार्यक्रम केले...आणि असंख्य श्रोत्यांच्या मनात त्यांनी आपल्या एकत्रित आवाजाने स्थान निर्माण केले...लोक आता त्यांना एक नावाने ओळखू लागले...जगजीत-चित्रा !
दरम्यान,चित्रा या विवाहित होत्या...पारले कंपनीच्या उच्चस्थ अधिकारी देव बाबू यांच्या त्या पत्नी होत्या...तसेच त्यांना 'मोना' नावाची मुलगी देखील होती...
परंतु, अंतर्गत नातेसंबंधात चित्राजी खुश नव्हत्या...त्यांनी देव बाबू यांच्याकडे डिओर्सची मागणी केली आणि देव बाबू व चित्रा यांच्यात सामंजस्य पद्धतीने डिओर्स झाला. त्याच वेळी जगजीत यांनी स्वतः देव बाबू यांना भेटून त्यांच्या पत्नीसोबत (चित्रासोबत) लग्नाची परवानगी मागितली...आणि देव बाबूंनी ती दिली...आणि जगजीत-चित्रा यांनी लग्नाचा निर्णय घेतला...
इथे त्यांना त्यांचीच एक गजल सार्थक ठरली...
""उस मोड़ से शुरू करे फिर ये जिंदगी
हर शे जहां हसीन था हम तुम थे अजनबी..."
मित्रांनो,गम्मत अजून बाकी आहे....
जगजीत-चित्रा यांचं लग्न अवघ्या ३० रुपयात झाले. जगजीत यांचा तबलजी याने भटजींची तर गजल गायक भुपींदर सिंग यांनी हार आणि मिठाईची व्यवस्था करून हा लग्न सोहळा संपन्न केला....
मित्रांनो, अजब आहे हे सगळं...एकाच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जगजीत चित्रा यांनी दुनियेसाठी त्यांच्या प्रेमाची एक मिसाल कायम केली आणि ती आयुष्यभर जपली...
"दिल के दीवारे दर्द क्या देखा
बस तेरा नाम ही लिखा देखा...
तेरी आंखोमें हमने क्या देखा...
कभी कातिल कभी खुदा देखा..."
लाईव्ह मैफल असो किंवा कार्यक्रम...जगजीत यांच्या मस्करीच्या स्वभावामुळे ते कायम चित्राजी सोबत गायला असल्या की त्यांच्यात अनेक थट्टा,मस्करी जगजीत करायचे...
याचं एक उदाहरण म्हणजे जगजीत-चित्रा यांचं पंजाबी थप्पे नावाची गजल खूप लोकप्रिय झाली...त्यात दोघांच्या थट्टा मस्करीची एक शेर पहा...
"चित्रा : कोठे ते आ माहियाँ,
मिलना ता मिल लेंगे
ना तू खस्मा नू तू खा माहियाँ...
जगजीत : के लेनाये हैं मित्रा तू
मिल ने तो आ जावां
डर लगता ये 'चित्रा' नू...."
जगजीत यांनी उर्वरित आयुष्यात चित्रजीं सोबत अनेक अल्बम केले...खूप काम केलं त्यांनी एकत्र...आणि मृत्यूच्या क्षणापर्यंत त्यांनी चित्रजींना स्वतःपासून दूर केले नाही...आजही जगजितजींच्या नंतर चित्रजींनी एकही गाणं करण्यास पसंत केलं नाही...त्या जगजितच्या आठवणीत आणि आवाजात मशगुल आहेत...
"मिल कर जुदा हुए तो,ना सोया करेंगे हम...
एक दूसरे की याद में,रोया करेंगे हम...."
संपादन-संकलन : (C) सचिन सुशील.
Comments
Post a Comment